Monday 23 July 2018

युद्ध आमुचे सुरु....


सावधान !! आता तरी जागे व्हा !!


आपली घोर फसवणूक होत आली आहे आणि अजूनही जगात आपल्याला "आयुष्य कस जगावं" ह्याचे डोस पाजणाऱ्यांची बौद्धिक भामट्यांची एक वेगळीच फौज आपल्या आयुष्याच्या मूळ उद्देशावर अतिक्रमण करत आली आहे. लहानपणी पंचतंत्रातील  गोष्टी, नंतर शाळेतील सुविचार, सांसारिक आयुष्यात संत वचने , पालक, नातेवाईक, मित्र हे सगळे आपल्याला आपल्या ह्या भूतलावरील अवताराचा खरा उद्देश आपल्याला कळू न देता दांभिकपणे आपल्याला गाफील ठेवत आले आहेत.


आपला जन्मच समाजाचे काही भले करण्यासाठी झालाय तर समाजात इतर लोक का जन्माला आलेत हा सरळ प्रश्न आमच्या कवटीत येतो ! 🤔

सकाळी डोळे उघडून बघावे तर मोबाईल त्या सुविचारांच्या ओझ्याने वाकलेला असतो
काय ते एक एक मेसेज?
डॉ. कलामांनी तत्वज्ञान विषयात PHd केली होती की वैज्ञानीक संशोधनात हा एक अभ्यासाचा विषय,
विश्वास नांगरे पाटील मोबाईल वर पावसाळी वातावरणात वीज कशी पडते ह्याचे ज्ञान वाटतात
नाना पाटेकरांच्या नावाने तर इतकी ज्ञानगंगा वाहतेय की त्यांना प.पू. ही उपाधी मिळेल अशी शंका येते

कोणी फुलांच्या, कोणी मुलांच्या, कोणी देवाच्या चित्रावर मनाला वाट्टेल ते सुविचार खरडून देतो पाठवून! अरे कुठं फेडाल हे पाप?

कोणी तुम्हाला अडचण सांगितली की दे सल्ला, कोंब सुविचार कानात आणि फाड त्याचा मेंदू हे असले धोरण राबवतात काही जण. काय झालय लोकांना?

बरं ह्यांचे सुविचार अभंग, ओव्या, चारोळ्या, शायरी, गझल, इंग्रजी र्हाइम्स अश्या मिळेल त्या स्रोतातून ओरबाडून आणलेले असतात
ही सुविचारी टोळी फक्त तत्वज्ञान वाटून थांबत नाही तर
आरोग्य, अर्थकारण, राजकारण, क्रीडा, स्वयंपाक, कुटनीती अश्या सगळ्याच क्षेत्रात फोफावली आहे

काय ते ह्याच्यात ते टाकून प्या किंवा खा मग अमुक तमुक आजार कसा बरा होतो
एखाद्या राजकारण्यांचे उदात्तीकरण करण्याचा कारखाना काढणे
देशाचे आर्थिक धोरण ठरविणे असे प्रकांड उद्योग बिनबोभाट चालू आहेत आपल्या भोवती

किती माहिती आपण विनाकारण आपल्या आधीच ताणलेल्या मेंदूत विनाकारण कोंबत असतो, का? कोणासाठी? कशासाठी? कधीपर्यंत?ह्याचा विचार न करता आपण सगळे हे ज्ञान वाटत फिरत असतो

आपल्याला खरी गरज आहे विरंगुळ्याची आणि तो मिळतो खऱ्या खुऱ्या गोष्टींतून
खेळांमधून, गप्पा मारून, सोबत जेवण करून, प्रवास(सुटी म्हणून) करून, घरात स्वछता करून, नवं काही शिकून, व्यायाम करून,  मुलांना खेळवून, ज्येष्ठांना ऐकून

प्रत्येक नव्या गोष्टी सोबत वाहत जाण्यापेक्षा आपल्याला काय आवडत ते करण्यात खरं जगणं आहे, अस मला वाटत. नाहीतर तुम्हाला अस नको वाटायला की मीच ज्ञान द्यायला लागलोय

कळकळ ह्याचीच वाटते की माणसांमधले संवादाचे साधन म्हणून तयार झालेली साधनेच तो संवाद तोडायला लागलीत

आणि न कळत रात्री झोपताना हे जाणवत की शांततेच्या शोधात प्रगती करणाऱ्या माणसाच्या जाणिवांचे त्याच प्रगतिशी 'युद्ध आमुचे सुरू' असे हाल झालेत.
घ्या काळजी!!

आदिमानव आणि डेटा सिक्योरिटी

काल परवा पर्यंत आरामात बसलेल्या झुक्याची झोप उडाली , जो तो त्याला अद्वा तद्वा बोलायला लागला आणि होत्याच नव्हतं झालं बिचाऱ्याच!! वाईट वाटलं हो त्याच्याबद्दल.

त्याच्यामुळेच तर कैक कोटी ज्ञानी भारतीयांचा शोध लागला आपल्याला

मेकॉले ला मागच्या 100 वर्षात जे जमलं नाही ते मागच्या 10 वर्षात झुक्याच्या फेसबुकने करून दाखवलं.('करून दाखवलं' अस बोललं की शिवसैनिकांना निवडणुकीचा कैफ चढतो, पण इथं संदर्भ वेगळा आहे).

ह्या ऑनलाइन ब्रह्मदेवाने भारतात अचानक कोट्यवधी अर्थशास्त्री, समाजवादी, आरोग्यतज्ज्ञ, धर्मपंडित, राजकीय मुत्सद्दी जन्माला घातले जे ऑनलाइन चावडीवर बसून स्वतःची खाप पंचायत, दवाखाने, धार्मिक कार्यक्रम राबवत आहेत आणि अनेक रिकाम्या माठांना ज्ञानाचे पाझर फुटले.
जो तो तावातावाने आपापल्या अगाध ज्ञान सागरात इतरांना बुडवून अर्धमेलं होई पर्यंत डुंबवू लागलाय.

बरं हे ज्ञानसागर ढवळून काढायला लागणाऱ्या इंटरनेट नामक 'वासुकी नाग' अंबानी तात्यांनी लागोलाग आणला
मग काय भयंकर मंथन सुरू!
सकाळीच 'हॉट सीट', दिवसभर ऑफिस सीट, रात्री बेड वर पडून डोळे फुटोस्तर कमेंट्स लिहिणे, पोस्ट फॉरवर्ड करणे, टॅग करणे असे अनेक रत्न सुर-असुरांच्या हाती लागत राहिले

पण एक दिवस अचानक त्यातून 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल निघाले आणि हे सगळे ज्ञानी तळमळायला लागले. त्यांना असं वाटायला लागलं की झुक्याने तयार केलेली ही सृष्टी खोटरडी आहे, पापी आहे
कोणी मग स्वतःची लक्तरे लपवण्यासाठी अश्याच काही पोस्ट्स वर BFF लिहून पापक्षालन करण्याची केविलवाणी धडपड करू लागले
पण काही ताठ कण्याचे ज्ञानी लोक सरळ सरळ झुक्याला दोष देऊ लागले की आमची मौल्यवान खासगी माहिती तू विकली आता तुला माफी नाही
त्यात पुन्हा असुरांचे शिरोमणी पप्पूरासुर ह्यांनी ठिणगी टाकली की इंद्रा('नरे' सायलेंट आहे) हे हलाहल निर्माण करून स्वर्गाच सिंहासन मिळवलंय वैग्रे वैग्रे

शेवटी 'अनलिटीका' युगात झालेल्या ह्या मंथनाचे प्रायश्चित्य म्हणून शेवटी झुक्यानेच 'डेटा सिक्योरिटी' नामक हलाहल स्वतः च प्राशन करून ह्या ऑनलाइन सृष्टीला वाचवले

राहिला प्रश्न फेसबुकज्ञानी लोकांचा, त्यांच्यासाठी......

"हे हुच्च प्रतीच्या ज्ञानी विद्वानांनो तुम्ही का बरे हुंकारता डेटा सिक्योरिटी साठी? तुम्हीच तर स्वतः ओक ओक ओकता सगळं सगळीकडे
तुमचे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो, आधारकार्ड च्या प्रति सगळीकडे वाटत फिरता उघड उघड.
बिनकामाच्या लिंक वर जाऊन 99 रुपयात रिबॉक चा बूट मिळवणारे, 'विशेष' फोटोखाली स्वतःच्या नावाचे तीन अक्षर आणि .com लिहिणारे, फेसबुक खात सुरक्षित ठेवण्यासाठी BFF लिहिणारे तुम्ही अजूनही 'ऑनलाइन आदिमानव' आहात "

नको त्या वावटळीच्या मागे पळणारे रिकामटेकडे लोक केवळ इंटरनेट आणि फोन स्वस्त झाले म्हणून वाट्टेल ते थेर करणारे अर्धवट ज्ञानी असे कोट्यवधी भारतीय केवळ लोकशाही आहे म्हणून निव्वळ बेबंद वागत आहेत. जो पर्यंत हे असे लोक सुधारत नाहीत तोपर्यंत 'डेटा सिक्योरिटी' वर विचारमंथन करणाऱ्या पुढारलेल्या जगासमोर हे लोक अजूनही 'आदिमानव'च समजावे लागतील

-----------------------------
©Shreepaddeshpande
14 April 2018

Friday 20 July 2018

समग्र पोपटपुराण

अध्याय पहिला

एकेकाळी एका आटपाट नगरात सर्व लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आपापले काम करून पोट भरत आणि रात्री निश्चिन्त झोपत आणि पुन्हा आपापल्या कामाला जाणे असा त्यांचा दिनक्रम!

पण जगात सगळं सुरळीत थोडीच चालत? हळू हळू त्या नगरात काही लोकांनी वेगवेगळे व्यवसाय चालू केले.
त्यातच होते दोन भाऊ उधु आणि राजू, त्यांचे वाडवडील ईश्वराकडे गेल्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांनी नवे दुकान उघडले.

उधु झाला फोटोग्राफर आणि राजू झाला पेंटर. आता फोटो स्टुडियो ला जास्त जागा लागते म्हणून मोठा भाऊ असलेल्या उधु ने घरातल्या सगळ्या जागेवर स्वतःचाच व्यवसाय वाढवला
मग, अतिशय रागीट आणि स्वाभिमानी असलेल्या राजू ला हे सलत होत आणि त्याने एकेदिवशी घर सोडलं आणि थेट जाऊन छोट पण नवं घर बांधून आपला पेंटर चा व्यवसाय चालू केला. काही गावकऱ्यांनी देखील त्याच्या ह्या धाडसाचं कौतुक म्हणून त्याला 13 चौरस फुटांचा एक ओटा बांधून दिला आणि नाशिकहून खास तंबू आणून त्याच्या दुकानासमोर लावला. वाह!! आता मात्र राजू पेंटर सगळ्या नगरात प्रसिद्ध झाला होता.
नगरातील ज्येष्ठ असलेल्या वासुदेव काकांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी चिपळ्या वाजवत त्याला कानमंत्र दिला की स्वतःच दुकान काढलंस तर 16 तास मेहनत करून ते चालवणं भाग आहे. (वासुदेव काका नेहमी सकाळी रोज नव्या गल्लीत जाऊन जोरजोरात चिपळ्या वाजवून लोकांना हैराण करायचे, नगरातले सगळे त्यांच्यामुळे त्रस्त आहेत. असो, पण ही गोष्ट त्यांची नाही, त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी.)

तर अश्या प्रकारे उधु-राजू मध्ये भावबंदकी आली आणि त्यांनी एकमेकांवर नको नको ते शब्दपुष्प अर्पण करण्यास सुरुवात केली.

इकडे वासुदेव काकांच्या कुटुंबाचा एक सदस्य असलेल्या सुजित ने त्याचा मित्र पृथ्वीराज च्या साथीने सावकारी आटपाट नगरात सुरू केली, बघता बघता सगळ्या आटपाट नगरात प्रत्येकजण त्यांच्या पाशात अडकला
वेळप्रसंगी त्यांचे गुंड विंचू (स्कॉर्पिओ) घेऊन सगळ्या नगरात दहशत माजवत होते
वासुदेव काका आरामशीर चिपळ्या वाजवत हा सगळं प्रकार उघड्या डोळ्याने बघत असत. उधु-राजू तर एकमेकांना लाखोल्या वाहण्यात मग्न होते. गावात ज्यांना ज्ञानी-सर्वज्ञ समजावे असे लोक नगराची दुरावस्था करायला लागले.

पण, भगवंत हा नेहमीच निर्बलांना वाऱ्यावर सोडत नाही!! एकेदिवशी ऐन दिवाळीच्या दिवसात एक मोठ्ठ वादळ आलं आणि हा हा म्हणता उधु-राजू-सुजित-पृथ्वी-वासुदेवकाका सारख्या सगळ्या पुंडांची वाताहत झाली! जणू नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर हे सगळे असुरासम नर दानव गाडल्या गेले


आणि इंद्राचं राज्य आटपाट नगरात आलं!!


क्रमशः

©श्रीपाद देशपांडे
21 जुलै 2018
FreeToShare