Friday 20 July 2018

समग्र पोपटपुराण

अध्याय पहिला

एकेकाळी एका आटपाट नगरात सर्व लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आपापले काम करून पोट भरत आणि रात्री निश्चिन्त झोपत आणि पुन्हा आपापल्या कामाला जाणे असा त्यांचा दिनक्रम!

पण जगात सगळं सुरळीत थोडीच चालत? हळू हळू त्या नगरात काही लोकांनी वेगवेगळे व्यवसाय चालू केले.
त्यातच होते दोन भाऊ उधु आणि राजू, त्यांचे वाडवडील ईश्वराकडे गेल्यामुळे पोटापाण्यासाठी त्यांनी नवे दुकान उघडले.

उधु झाला फोटोग्राफर आणि राजू झाला पेंटर. आता फोटो स्टुडियो ला जास्त जागा लागते म्हणून मोठा भाऊ असलेल्या उधु ने घरातल्या सगळ्या जागेवर स्वतःचाच व्यवसाय वाढवला
मग, अतिशय रागीट आणि स्वाभिमानी असलेल्या राजू ला हे सलत होत आणि त्याने एकेदिवशी घर सोडलं आणि थेट जाऊन छोट पण नवं घर बांधून आपला पेंटर चा व्यवसाय चालू केला. काही गावकऱ्यांनी देखील त्याच्या ह्या धाडसाचं कौतुक म्हणून त्याला 13 चौरस फुटांचा एक ओटा बांधून दिला आणि नाशिकहून खास तंबू आणून त्याच्या दुकानासमोर लावला. वाह!! आता मात्र राजू पेंटर सगळ्या नगरात प्रसिद्ध झाला होता.
नगरातील ज्येष्ठ असलेल्या वासुदेव काकांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी चिपळ्या वाजवत त्याला कानमंत्र दिला की स्वतःच दुकान काढलंस तर 16 तास मेहनत करून ते चालवणं भाग आहे. (वासुदेव काका नेहमी सकाळी रोज नव्या गल्लीत जाऊन जोरजोरात चिपळ्या वाजवून लोकांना हैराण करायचे, नगरातले सगळे त्यांच्यामुळे त्रस्त आहेत. असो, पण ही गोष्ट त्यांची नाही, त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी.)

तर अश्या प्रकारे उधु-राजू मध्ये भावबंदकी आली आणि त्यांनी एकमेकांवर नको नको ते शब्दपुष्प अर्पण करण्यास सुरुवात केली.

इकडे वासुदेव काकांच्या कुटुंबाचा एक सदस्य असलेल्या सुजित ने त्याचा मित्र पृथ्वीराज च्या साथीने सावकारी आटपाट नगरात सुरू केली, बघता बघता सगळ्या आटपाट नगरात प्रत्येकजण त्यांच्या पाशात अडकला
वेळप्रसंगी त्यांचे गुंड विंचू (स्कॉर्पिओ) घेऊन सगळ्या नगरात दहशत माजवत होते
वासुदेव काका आरामशीर चिपळ्या वाजवत हा सगळं प्रकार उघड्या डोळ्याने बघत असत. उधु-राजू तर एकमेकांना लाखोल्या वाहण्यात मग्न होते. गावात ज्यांना ज्ञानी-सर्वज्ञ समजावे असे लोक नगराची दुरावस्था करायला लागले.

पण, भगवंत हा नेहमीच निर्बलांना वाऱ्यावर सोडत नाही!! एकेदिवशी ऐन दिवाळीच्या दिवसात एक मोठ्ठ वादळ आलं आणि हा हा म्हणता उधु-राजू-सुजित-पृथ्वी-वासुदेवकाका सारख्या सगळ्या पुंडांची वाताहत झाली! जणू नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर हे सगळे असुरासम नर दानव गाडल्या गेले


आणि इंद्राचं राज्य आटपाट नगरात आलं!!


क्रमशः

©श्रीपाद देशपांडे
21 जुलै 2018
FreeToShare

No comments:

Post a Comment