Friday 24 February 2017

उत्सव की श्रद्धांजली

त्याच कायेsss

"एखादी गोष्ट आपल्या जवळ नसली ना मग त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळायला लागते"

हा माझ्या आयुष्यात अजिबात बदल न घडवणारा पण जर आठेक  दिवस ऐकला नाही तर काही तरी चुकल्या चुकल्या सारखं वाटणारा संवाद दुर्दैवाने काही बाबतीत खरा झालेला. 

अगदी ४ वर्षांचा असल्यापासून माझ्या आजूबाजूच्या आज्जी, आई, काकू, मावशी, आत्या, मामी, बहिणी ते थेट बायको पर्यंत सर्वांनी कधीतरी कोणाबद्दलतरी उघडपणे किंवा माघारी, जवळ-जवळ हरलेल्या शाब्दिक लढाईचे विजयात रूपांतर करताना वापरलेलं एक जबरी अस्त्र म्हणून झालेला त्याचा उपयोग मला जवळून आणि अनेकदा अनुभवता आलाय. त्यामुळे माझ्या कोडगेपणात एक विशेष प्राविण्य आलंय  आणि आताशा त्यातली भेदकता कमी वाटायला लागली.कोणी पुरुष माणूस हे महान वाक्य उच्चारताना मी ऐकलं नाही आणि त्याच कारण शोधणे म्हणजे उगाच मधमाश्याच्या पोळ्यावर मायेने हात फिरवायला जाण्यासारखे असतं.

तत्कारणे बायकोला "हे ना आजकाल जास्त वादात पडत नाहीत आणि शेवटी माझं त्यांना पटत म्हणून जास्त विचारत देखील नाहीत" असं  ती एखाद्या तिच्या मैत्रिणिला किंवा खासकरून माहेरच्या एखाद्या व्यक्तीला सांगताना किती सुख मिळत असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.  
म्हणजेच एखादी गोष्ट हक्काची झाली की  माणूस  तितकीशी फिकीर नाही करत तशीच, ती जर हळू हळू त्याच्या कडून काढून घेतली तर तो तितकासा विव्हळत देखील नाही सगळं कस सोपं असत फक्त हळू हळू सवय लावावी लागते.

लहानपणी जेवायला काही तरी मस्त म्हणून खमंग थालपीठ आणि खीर पाहून तृप्त होणारे आपण पिझ्झ्याचे आणि बर्गरचे लचके तोडून चॉको लाव्हा केक किंवा तत्सम डेझर्ट खाऊन ऍसिडिटी ची ढेकर दिल्याशिवाय एखाद्या प्रसंगाचे सेलिब्रेशन पूर्ण मानत नाही. हे काय एकदम झालं? छ्याsss तब्बल १०-१५ वर्ष लागली आपल्याला मॉडर्न कल्चर शिकायला. "साधतसे सिद्धी करिता सायास" असं 'सेंट' तुकाराम किंवा 'सेंट' रामदास कोणी तरी बोलून गेलेत आणि आपण हळूहळू इतके निपुण झालो की पुण्यातल्या एका आदरणीय काकूंनी (पुण्यात वय वर्ष १५० पेक्षा कमी वयाच्या स्त्रीला 'काकू' म्हणणे गुन्हा असूनही) "आज आपण उपवासाचा पिझ्झा कसा बनवायचा ते शिकू" ह्या शीर्ष वाक्याने त्यांची पाककला दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित केलीये.

कस आहे, म्हणजे आम्ही आमचं मूळ विसरून इतके निराधार होतोय की  कोणत्याही अल्पजीवी फॅशन च्या आहारी जातो, फक्त चकाकणाऱ्या पण मूल्यहीन संकल्पनांना डोक्यावर घेऊन नाचतोय आणि "पुढे काय?" ह्याचा विचार न करताच जग हाकलेल  तसं  हाकलल्या जातोय. हे काय एकदम झालं? छ्या sss  तब्बल ५० -६० वर्ष लागली. इंग्रजी म्हणजे स्टेटस सिम्बॉल , मराठी म्हणजे मागास कंगाल ही  समज मराठी लोकांत रुजली, पोसल्या गेली, वाढीस लागली आणि मजबूत झाली. ती  का झाली त्याच कारण म्हणजे आपल्याला आपल्याच भाषेची लाज वाटणे ह्यातून झाली असा माझ ठाम मत आहे (किंबहुना पुण्यात तुम्हाला प्रत्येक विषयात 'ठाम' मत असल्याशिवाय इथला पासपोर्ट मिळत नाही ! माहितीए ?)

मागील अनेक वर्षात परिस्थितीने सधन किंवा शहरी किंवा बुद्धिवादी प्रगल्भ समाजाने इतर भाषांना अतिशय अवास्तव महत्व तर दिलेच पण मराठी भाषेची गळचेपी स्वतःच केली. ह्याचाच परिणाम म्हणून कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात "कामवाली गंगूबाई"चं फक्त मराठी राहीली  जेंव्हा कि इतिहासात भारतात पहिला चित्रपट मराठी माणसाने बनवला. रजनीकांत हा तामिळ सुपरस्टार म्हणून अभिमानानं राहतो पण सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर मराठी खेळाडू म्हणून राहू शकले नाही. इतकेच काय ९० च्या दशकात आमचा मुलगा इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतो असे सांगनारे पालक मराठी मुलांच्या पालकांना एका हीण स्वरात सांगताना मी स्वतः पाहिलंय.

मराठी शाळा मेल्या , मराठी साहित्य मेले, मराठी पदार्थ मेले , मराठी खेळ मेले , मराठी सणवार मेले , मराठी इतिहास मेळा , मराठी आदब मेली, मराठी शुभंकरोती मेली , मराठी तिथी तारखा मेल्या, नऊवारी-नथी-कुंकू-पैंजण-फेटा- धोतर मेले इतकच काय मंगळसूत्र-जोडवे हि 'मागास' झालेत, अंगाई-पाळणे-जोगवे-काकडआरत्या - श्लोक-अभंग-पोवाडे विरलेत, मराठी लोकांचा व्यापार गेला , जमिनी गेल्या , शिक्षण संस्थागेल्या, नोकऱ्या गेल्या, धमक-चमक-गमक- कुमक सगळंच संपलय  एकदम नाही . . . . . . . .  हळू हळूच आणि  नसेल संपलं  तर संपेल !

मान्य की मराठी शाळांच्या इमारती चांगल्या राहिल्या नाहीत म्हणून मुलांना 'चांगली' शाळा मिळत नाही  पण घरी तरी मराठी बोला. जो पर्यंत आपण मराठीला ज्ञानभाषा म्हणून त्यात योगदान देत नाही तो पर्यंत हे असच चालू राहणार.

प्रयत्न करून बघा , Hi चा नमस्कार करून, गेट टुगेदर ची अंगत पंगत करून, केक कापण्या सोबत औक्षण करून , डायनिंग टेबल च्या घरात देव पूजेच्या पाटाला जागा देऊन. ट्विंकल ट्विंकल सोबत मामाच्या गावाला गाऊन, गुढीपाडव्यालाच नवीन वर्ष म्हणून, कॉर्नफ्लेक्स चे दुधपोहे करून आणि मुळात हे सगळं मागास किंवा 'डाउन मार्केट ' न समजता आपलं , स्वतःच, हक्काच, आपुलकीच , मनातलं , समाधानाचं वैभव म्हणून. जगात जिंकायला स्वत्व सोडायची गरज नसते मुळी . दुसऱ्या भाषा-संस्कृती शिका ना कोण नको म्हणतय पण आपल ते अभिमानाने सांगायची लाज कशाला? गर्जु  द्या कि मराठी चा जयजयकार !!

अजूनही "मराठी विज्ञान परिषद,मुंबई" किंवा "मराठी साहित्य परिषद, पुणे" किंवा सिंधुताई सपकाळ किंवा बाबा आमटे आणि पुढल्या पिढ्या ह्या, जागतिक कीर्तीचे डॉ. नारळीकर, डॉ. माशेलकर मराठीत त्यांचं ज्ञान आपल्यासाठी मराठीत लिहू शकतात,काही मायभूमी पासून दुरावलेले स्वतःच्या पैश्यातून विदेशात 'मराठी मंडळाचा' डोलारा सांभाळतात  आणि आपल्याला ज्ञात-अज्ञात अश्या अनेक व्यक्ती किंवा संस्था मराठी च्या मशालीला  नेमाने तेल-पाणी  करताहेत. त्यांची शक्ती कितपत टिकेल ह्या जागतिकीकरणाच्या तुफानात ते माहीत नाही. पण आपल्यासारखे  सामान्य दगड मात्र छोट्या छोट्या सवयीतून त्या मशाली भोवती एक मजबूत बुरुज बांधू शकतो आणि कधी काळी वैभवशाली असलेली माय मराठी जगवू  शकु , टिकवू शकु आणि टिकलोच तर वाढवू देखील. मराठी माणूस खेकडा असतो हि ओळख पुसून मुंगीची ओळख मिळवू !

२७ फेब्रुवारीला जागतिक मराठी राजभाषा दिन आहे ! त्याला "दीन" न बनावता अभिमानाने डोक्यावर घ्या आणि त्याला उत्सव म्हणायचं का  श्रद्धांजली असा प्रश्न आपल्या भावी पिढीला पडता कामा  नये !

कारण
. .
. .
. .
. .
त्याच कायेsss

"एखादी गोष्ट आपल्या जवळ नसली ना मग त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळायला लागते"

8 comments:

  1. ek number once again you have shown how good you are... :)

    ReplyDelete
  2. ANi marathi palkani mulana marathi t bolaychi sakti keli pahije

    ReplyDelete
  3. Ajun hi tanmay chya class madhe koni marathi asel to khush houn sangto to/ti aplya sarkhya marathi ahe

    ReplyDelete
  4. Khup chan... ani atyant vastavwadi lihilays

    ReplyDelete