Wednesday 8 February 2017

कुठे शोधीशी.......

"माझ्याच नशिबी असं  का ? खरंच देव आहे का ह्या जगात? "

हे आपल्या सगळ्यांचं आवडत वाक्य जे कि नेहमी आपल्या नावडत्या वेळेस आपण वापरतो. सगळे प्रयत्न करून थकून जातो आपण, धीर सोडतो, आशा संपते, दिवसांमागे दिवस जातात पण जे साध्य करायचं ते खरंच का मिळत नाही ? नेमकं काय चुकलयं हे पण कळत नाही. 

प्रयत्नांची शीग संपली की  नशिबावर विश्वास ठेऊन आपला रामगाडा आपण ढकलत राहतो आणि तरीही इतरांना विनासायास सगळ्या गोष्टी मिळतात हे पाहून मनात असूयादेखील येते आणि आपलं नशीबच वाईट म्हणून अजून निराशे चे बकाने भरतो . मानवी विचारशक्ती जिथे संपते तिथे मग आपण इतके उद्धट  होतो कि सगळ्याचा दोष देवावर ढकलून सगळ्या अपयशाचं खापर फोडायला देवाचं टाळकं वापरून मोकळे होतो. तो (देव) बिचारा निमूट आपल्या लेकरांचे बोलणे खात उभा असतो. 

हाच तर मानवाचा मूळ स्वभाव आहे. जे काही आपल्या सध्याच्या कामाचं नाही ते सगळं अडगळीत टाकतो आपण. त्यात सगळं येत, नदीत गटार सोडून, घर बांधायला जंगल तोडून, माय - बाप म्हातारे झाले कि घराबाहेर काढून, भूक लागली कि मुके प्राणी फाडून  मग कधीही न दिसलेला देव कसा सुटेल??

जरा कधी आपण दुःखात असलो कि एका आधाराची गरज असते पण सभोवतालच्या माणसांवर विश्वास ठेवण्या इतपत माणूस वेडा नाही म्हणून तो सरळ देवाला साकडं घालतो आणि रिझल्ट पण पटकन हवा असतो आपल्याला.  पण कित्येकदा न मागता तो काय देत हे आपण सोयीस्कररित्या विसरतो 

दुसरीही मुलगीच झाली म्हणून देवाला दोष देणार्यांनी जरा त्यांच्या डोळ्यात देव पाहावा ज्यांना अनेक वर्षांनी बाळ होते आणि नाही का ते नवे नवे आई बाबा पहिल्यांदा त्या बाळाला पाहून डोळ्यातल्या पाण्याचा नैवद्य मनोमन देवाला दाखवतात ?

रोज बेरोजगारीचे चटके झेलणाऱ्या तरुणाला जो एके दिवशी मुलाखत संपवताना म्हणतो कि "कधी रुजू होशील कामावर, हे घे तुझं ऑफर लेटर" तो देवापेक्षा कमी वाटतो का? आणि आपण रोजच्या कामाचा कंटाळा आला राव म्हणून देवालाच दोष देतो !!

सराफकडून दागिने विकत घेताना आपली किती फसवणूक होते ह्याची चीड येते पण हताशपणे मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या दागिन्यांची पिशवी रिक्षात विसरते आणि थोड्या वेळाने तोच रिक्षेवाला ती तशीच्या तशी वापस करतो तेंव्हा तो(देव) कोणत्याही रूपात येऊ शकतो ह्यावर विश्वास बसतो कि नाही?

कधी झोपलेल्या बाळाचा निरागस चेहरा बघून , कधी "तू काळजी करू नको, मी आहे ना " असं सांगणाऱ्या मित्राचा हात धरून, तुम्हाला कधीच "नाही" न म्हणलेल्या बाबाला बघुन आणि कधीच उपाशी न ठवणाऱ्या आईला बघून, दुरूनही तुमची काळजी करणाऱ्या बहिणीला किंवा पाठीत दणका देऊन शिकवणाऱ्या भावाला आठवून बघा देव आपल्याला आठवतो का? दिसतो का ? जाणवतो का ? 

आपण कसेही असलो तरी त्याच आपल्यावर प्रेमच असत फक्त आपलं हे चुकतं  कि आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे हि वृत्ती आपण सोडत नाही. 

काहीतरी मिळवणं म्हणजेच जगणं, केवळ जिंकणं म्हणजेच पुरुषार्थ ह्यावर आपला दृढ विश्वास बसायला लागलाय आणि कोणी कितीही आपल्या कानी कपाळी ओरडून सांगितलं कि " कर्म करा फळाची अपेक्षा करू नका" तरीही ह्याचा बोध आपण असाच घेतो कि कर्म केलं तर त्याच फळ आज ना उद्या आणि आपल्याला पाहिजे ते मिळणारच !! गीतेत सांगितलंय !!!

पण आपण फळा पेक्षा झाड लावण्याचा आनंद घेऊ शकलो तर जगणं सार्थक होईल आणि देवाला बोलणी खावी लागणार नाहीत. 😄

शेवटी, सुदामा त्याच्या बायकोने कृष्णाकडे धन मागण्याच्या गोष्टीला विसरला आणि केवळ प्रेमापोटी कृष्णाला भेटला आणि म्हणून देव देतो तेंव्हा आपली झोळी फाटल्या शिवाय राहत नाही, काय ??  


12 comments: